Sunday, October 1, 2023

गौराई


आज सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवला आणि पुनरागमनाय च असं म्हणणार तेवढ्यात कोणी तरी बोललं, कशी आहेस? किती धावपळ करतेस? थोडी विश्रांती घे, बस निवांत, बोलू जरा. आमच्या येण्याने तुम्हा बायकांना अगदी उसंत मिळत नाही. आमच्या तरी किती तर्‍हा. तुझ्याकडेच बघ एक येते श्रावणात शुक्रवारी आणि दुसरी भाद्रपदात. काही जणी सुगडावर, काही उभ्या, काही तांब्यावर, काही पानांवर तर काही खड्यांच्या अशा वेगवेगळया पद्धती. त्याबरोबरच ते साग्रसंगीत जेवण. पुरणपोळ्या, सोळा भाज्या, कोशिंबिरी, चटण्या आणि करंज्या, लाडू, अनारशासारखे फराळाचे पदार्थ. कदाचित हे पूर्वापार चालत आले किंवा या हवामानात सर्व भाज्या चांगल्या मिळतात किंवा सर्व रस आपल्या जेवणात असले तर ते स्वास्थ्यवर्धक असते म्हणून असावे. खरंतर सध्याच्या जमान्यात हे रुचकर पदार्थ योग्य पद्धतीने केले तर गप्पा मारायला आलेल्या मैत्रिणींना पटकन देता येतील म्हणून हे फराळाचे पदार्थ असावेत. या निमित्ताने तुम्हा मैत्रिणींना छान सजून एकमेकींकडे जाऊन मनसोक्त गप्पा मारता येतात. पण बर्‍याच वेळा सर्वच गोष्टींचे अवडंबर माजवले जाते. त्यामुळे तुम्हा बायकांची खूपच धावपळ होते. आपल्याला जमेल तसे मनोभावे करावे. 

बाकी तुझे Women networking कसे चालले आहे? महिला सक्षमीकरण झाले तर त्या समर्थपणे आणि सजगतेने जबाबदारी पेलू शकतात हा जी-२० परिषदेचा आणि तुझा अजेंडा सारखाच आहे की. त्यासाठी महिलांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-२० परिषदेने उचललेले पाऊल अगदी योग्यच वाटलं. 

शैक्षणिक प्रगती बरोबर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे. अर्थात मुलगी शिकली की प्रगती होतेच पण निर्णय प्रक्रियेत जर महिलांचा सहभाग असेल तर सामाजिक विकास नक्कीच लवकर होऊ शकतो. मंगलयान, चांद्रयान आणि आदित्य एल 1 या सर्व अंतराळ मोहीमा यशस्वी करण्यासाठी स्त्री स्त्रियांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. 

सध्या जागतिक स्तरावर ज्या समस्यांना सामोरे जात आहोत त्यामध्ये हवामान बदल आणि सायबर सुरक्षा या महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही मध्ये जी-२० परिषदेमध्ये सुचविल्याप्रमाणे सायबर सुरक्षेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत आणि ते राबविण्यात महिलांचा सहभाग असणे आवश्यकच आहे. तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने योग्य पावले उचलली जावीत यासाठी महिलांकडे नेतृत्व असणे गरजेचे वाटते. अगदी छोटसं उदाहरण घेतलं तर हे लक्षात येईल, घरात प्लास्टिकच्या वस्तू न वापरण्याचा निर्णय महिलांनी घेतला तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे जगाला पटलेले असून समाजाच्या सर्व क्षेत्रात सक्रिय योगदान देण्यासाठी नारीशक्ती नक्कीच प्रभावी ठरेल. सध्या फक्त १० टक्के महिला सक्रिय राजकारणात आहेत. महिलांनी राजकारणात यावे यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल असं वाटतं. 

वित्तीय प्रणालीमध्ये महिलांच्या समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी महिलांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर असायला हवे. याची सुरुवात अगदी शाळेत असल्यापासून होऊ शकते. म्हणूनच आपल्या स्कॉलरशिपच्या पैशातून गुंतवणूक करणार्‍या तुझ्या मुलीचे खरंच कौतुक वाटलं. "आई मी घेतलेला शेयर ११० टक्के वाढला, अजून घ्यायला हवे होते. क्रिकेट वर्ल्ड कप भारतात आहे तेव्हा हॉटेल किंवा ऑन लाईन फूड डिलिव्हरी शेयरच्या किमती वाढू शकतील का?" अशी तुमची चर्चा ऐकून छान वाटलं. 

अष्टावधानी असावे हे म्हणणे सोपे आहे पण निभावून नेणे तेवढेच अवघड . वेगवेगळया आघाड्यांवर लढताना ताणतणावांकडे, लक्ष द्यायलाच हवे. यासाठी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे त्याकडे मात्र तुम्ही बायका दुर्लक्ष करता. आहार, विहार आणि शारीरिक व्यायामाबरोबरच मानसिक स्वास्थ्य तेवढेच महत्त्वपूर्ण आहे. स्वतःसाठी वेळ दे, स्वतःच्या आवडीनिवडीकडे लक्ष दे व एखादा छंद जोपास. 

निरोगी व सुखासमाधानात रहा हाच आमचा शुभाशीर्वाद !!! 


सौ. स्नेहल कमलापूर


Read More

Friday, August 18, 2023

मिळवतीची पोतडी : अनुभव समृद्धी

 



स्त्रीची दोन वेगळी रूपे या आठवडय़ात अनुभवास आली. एकीकडे होती मुले लहान असल्याने नोकरी सोडणारी स्त्री तर दुसरीकडे पोळ्यांचे काम करून मिळणार्‍या पगाराचे प्रत्येकाकडून पत्र घेऊन घर घेण्यासाठी कर्ज मिळावे म्हणून बॅंकेत निवेदन देणारी एक कष्टकरी महिला. एकीने घरच्या जबाबदाऱ्यासाठी नोकरी सोडली तर दुसरीने नोकरी करून घरची जबाबदारी घेतली. त्याचवेळी डोळ्यासमोर आलं ते विद्या बाळ आणि मेधा राजहंस यांनी संपादित केलेलं "मिळवतीची पोतडी" हे पुस्तक. 

या  पुस्तकाच्या प्रस्तावनेत विद्या बाळ म्हणतात, "पोतडी आणि अलिबाबाची गुहा उघडली की काय बाहेर येईल सांगता येत नाही". खरंच "मिळवतीची पोतडी" तून बाहेर पडतात ते अनुभवाचे बोल. 

मिळवती म्हणजे पैसा मिळवणारी असा खरंतर मर्यादित अर्थ. तो तसाच असावा का असाही प्रश्न पडतोच. 

अचानक मोहन गोखले हे जग सोडून गेल्यावर सुन्न झालेल्या स्वतःशीच लढून जिंकलेल्या शुभांगी गोखले. 
नोकरी, लेखन व अभिवाचन करून सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकरांची मुलगी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णीची आई याशिवाय वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वीणा देव. 
मजा म्हणून लॅक्मे साबणाचे मार्केटिंग, वर्तमानपत्रातील लिखाण व त्यानंतरची शिक्षण क्षेत्रातील नोकरी सोडून वर्ल्ड बँक प्रोजेक्टवर काम करताना शिक्षण क्षेत्रातील संलग्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रगल्भ अनुभव असणाऱ्या व प्रकाश जावडेकरांची पत्नी याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्राची जावडेकर. 

ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. या बरोबरच कष्टकरी, नोकरी करणाऱ्या, नोकरी देणाऱ्या, पत्रकार, लेखिका, व्यवसाय करण्याऱ्या स्त्रियांपासून ते सामाजिक कार्य करणाऱ्या विविध स्तरातील मिळवत्या स्त्रियांची मिळवतीची पोतडी म्हणजे अनुभवाची समृद्धी आणि प्रगल्भतेचं अवकाश. 

मिळवतीच्या पोतडीत असलेल्या आर्थिक स्थैर्याच्या बटव्यात समाधान, स्वास्थ्य व प्रतिष्ठा तेवढीच महत्वाची वाटतात. येथे आहे ती धावपळ, शिस्त व सहनशीलतेच्या रेशीम धाग्यांनी गोफ विणत येणारी समृद्धी. 

साधारण २२-२३ वर्षांपूर्वीचा मिळवतीचा काटेरी मुकुट अजूनही बऱ्याच जणींसाठी तो काटेरीच आहे हे नक्की. जगण्यासाठीचा मोठा परीघ आखताना भावनिक गुंतणं, कोसळणं जाणवत राहतं. राग, लोभ, संघर्ष, रुसवे-फुगवे आणि असहकार या काट्याकुट्यातून, अपराधी न समजता वेगवेगळी नाती निभावून नेताना आयुष्याचा महत्वाचा टप्पा कधी पार होतो हेच समजत नाही. 

अर्थात हा जमाखर्च मांडताना अनुभवाची समृद्धी, सुसंगत विचार करण्याची ताकद, निर्णय क्षमता, आत्मविश्वास व आत्मभान यातून मिळणारे बौद्धिक समाधान आणि स्वातंत्र्य मिळवतीच्या या पोतडीतून डोकावतात.



डॉ. स्नेहल कमलापूर
Read More

Wednesday, June 21, 2023

योग: एक परिपूर्ण जीवनशैली

Yoga for Humanity



२१ जून, आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस. 

योग या शब्दाचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर - मनाशी, मन - आत्म्याशी आणि आत्मा परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग. २५०० वर्षांपूर्वी पतंजली ऋषींनी 'पातंजल योगसूत्र' हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी अष्टांग योग सांगितला आहे. ते म्हणतात, 'योग:श्चित्तवृत्ती निरोध:'. म्हणजेच चित्ताची चंचल वृत्ती कमी करून मन शांत व संतुलित ठेवून आध्यात्मिक उन्नतीकडे नेतो तो योग. या आध्यत्मिक उन्नतीकडे जाताना शारीरिक आरोग्य सांभाळणेही अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी ऋषी-मुनींनी आपल्याला आसन आणि प्राणायाम ही दोन महत्त्वाची साधने दिली आहेत. 

आसन – आसन म्हणजे 'कर चरण संस्थान विशेष:' हात व पायांची केलेली विशिष्ट रचना म्हणजे आसन. ते स्थिर आणि सुखकारक हवे. 

आसनात येणारे विशिष्ट ताण, दाब आणि पीळ यामुळे अनेक फायदे मिळतात. 
  • शरीर अत्यंत लवचिक बनते
  • स्नायूंचा tone सुधारतो. शरीरातील toxins बाहेर पडायला मदत होते
  • रक्ताभिसरण (blood circulation) सुधारते
  • डोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा योग छान काम करतो
  • योगासनांमुळे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. यामुळे मनावरचा ताण कमी होऊन quality output आपण देऊ शकतो
  • शरीरातील अनेक hormones चे संतुलन होते व त्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी, menopause किंवा PCOD मुळे होणारे त्रास कमी होतात
  • काही आसनांमध्ये abdominal stretching होते. त्यामुळे insulin secretion होते. यामुळे मधुमेह असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो
  • काही आसनांमध्ये chest expansion होते. ही आसने हृदयाचे आरोग्य आणि उच्च रक्तदाब यासाठी फायदेशीर ठरतात
  • आपण स्त्रिया खूप वेळ उभे राहून काम करतो. त्यामुळे होणारा vericose veins आणि पाय दुखण्याचा त्रास काही आसनांमुळे कमी होतो
  • पोट साफ न होणे, bloating जाणवणे यासाठी पवनमुक्तासन, मलासन या सारखी आसने फायदेशीर ठरतात
  • मानदुखी, कंबरदुखी, sciatica वर उपयुक्त आसने करून आपण हा त्रास कमी करू शकतो
  • Parasympathetic nervous system activate होऊन body relax होते. त्यामुळे शांत झोप लागते.
मात्र ही सर्व आसने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावीत. 

प्राणायाम – प्राणायामाच्या माध्यमातून जेवढे जास्त प्राणशक्तीचे संचरण शरीरात होईल तेवढे आरोग्य चांगले राखले जाईल. ऋतूनुसार प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखालीच करावेत. 

सूर्यनमस्कार – वजन कमी करणे, कार्यक्षमता वाढवणे, शारीरिक ऊर्जा निर्माण करून तेजस्वी - ओजस्वी ठेवण्याचे काम सूर्यनमस्कारामुळे होते. 

ओंकार साधना – आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजणच तणावामध्ये  (stress)  असतो. ओंकार साधनेने आपण हा तणाव (stress level) नक्कीच कमी करू शकतो. 

चला तर मग, या योगदिनानिमित्त योगिक जीवनशैली अंगीकारून आपले सुंदर जीवन आपण आणखी निरोगी व सुंदर बनवूया. यामध्ये आपल्या कुटुंबाला व प्रियजनांना सामावून घेऊया. योग हा भारताचा ठेवा जपूया आणि पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करूया. 


 सौ. वैशाली गांधी,  
योग शिक्षिका, पुणे
 ९४२०३२१५०३
Read More

Wednesday, March 8, 2023

डिजिटल तंत्रज्ञान आणि महिला !




काय गं कोणत्या गहन प्रश्नावर एवढा विचार करते आहेस ? 
अगं स्वतःला दोष देते आहे एवढे कसे माझ्या लक्षात आले नाही. मेसेज वर आलेल्या लिंक वर क्लिक करायचे नाही, डिजिटल पेमेंट करताना व्यवस्थित शहानिशा करायची , नेट transaction करण्यासाठीही लिमिट ठेवले आहे असे असून ही मैत्रिणीचा व्हॉट्सॲप मेसेज आला म्हणून पैसे पाठवून मोकळी झाले. दोन तीन वेगवेगळ्या नंबर वरून तिचा मेसेज पाहून शंका आली म्हणून फोन करून विचारले तेव्हा तिचा मोबाइल हॅक झाला असून त्या नंबरचे सगळे मेसेजेस डिलिट  झाल्याचे लक्षात आले. जर दोघींनीं two step verification केले असते तर कदाचित दोघींना त्रास झाला नसता. 

छोट्याश्या गोष्टीमुळे मोठ्या आर्थिक, मानसिक किंवा सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

W20 आणि संयुक्त राष्ट्रसंघ (United Nation) चे उद्दिष्ट डिजिटल संधीमधील लिंगभेद दूर करणे तसेच स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हे आहे. सध्या G20 चे नेतृत्व भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी करत असून W20 हा G20 चा अधिकृत गट आहे. या गटाने महिला उद्योजकता, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल संधीमधील लिंगभेद दूर करणे, महिलांचे शिक्षण व कौशल्य विकास आणि वातावरण बदल या पाच महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षीची संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक महिला दिनाची theme ही अगदी मिळतीजुळती आहे "DigitALL: Technology and innovation for gender equality".

डिजिटल तंत्रज्ञान हे व्यवसाय आणि समाजाच्या केंद्रस्थानी आहे. महिला सक्षमीकरणासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठीचे योग्य शिक्षण घेणे आवश्यक आहे. महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम बनते. 

डिजिटल तंत्रज्ञानाने तसेच Information and Communication Technology (ICT) च्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणे, आपले उत्पादन विकणे, चांगली नोकरी मिळवणे, शिक्षण घेणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे, आर्थिक व्यवहार, सामाजिक कार्यात सहभाग तसेच माहीती मिळवणे यासारख्या किती तरी गोष्टी शक्य आहेत. यामध्ये शहरी व ग्रामीण महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी गरजेची आहे ती डिजिटल साक्षरतेची. डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्याने महिला महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 

डिजिटल वापरातील संधीमधील लिंगभेद हा फक्त मोबाइल किंवा इंटरनेट माहिती दळणवळण /तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेचा नसून बऱ्याच गोष्टीं मधील महिला व पुरुष यांच्या तफावतीतील आहे डिजिटल साधनांचा , तंत्रज्ञानांचा वापर आणि कौशल्यातील तफावत, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील शिक्षणातील तफावत, तंत्रज्ञानातील नेतृत्व तसेच उद्योगजकतेतील तफावत ही काही उदाहरणे देता येतील. पण हे सर्व तर उपलब्ध आहे असा विचार नक्कीच आपल्या मनात आला असेल. मात्र लिंगाधारित डिजिटल विभाजन निर्देशांक (The Gender Digital Divide Index (GDDI) ) पाहिला तर फक्त ५७% महिला इंटरनेट चा वापर करतात. हा अहवाल बनवताना वेगवेगळ्या उत्पन्न गटातील देश विचारात घेतले आहेत. यामध्ये भारत, ब्राझील, चिली, चीन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, इजिप्त, इथिओपिया, हैती, मेक्सिको, नायजेरिया, रशिया, सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्वीडन, ताजिकिस्तान, युगांडा, युक्रेन, युनायटेड स्टेट्स, व्हिएतनाम या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

Deloitte च्या अंदाजानुसार, 2019 ते 2022 पर्यंत एकूण जागतिक तंत्रज्ञान कार्यबलामध्ये महिलांचा वाटा 6.9% , आणि तांत्रिक भूमिकांमध्ये त्यांचा वाटा 11.7% ने वाढला असला तरी हे तंत्रज्ञानातील महिलांचे प्रमाण अगदीच कमी आहे म्हणजे साधारण २५% आहे. 

GDDI हा तीन निर्देशक श्रेण्यातील ३० वेगवेगळ्या गोष्टींवर आधारीत असून ह्यात 
  1. पायाभूत सुविधा - इंटरनेट कव्हरेज, आर्थिक दृष्ट्या परवडणारी पायाभूत सुविधा,माहिती संरक्षण, सायबर सुरक्षेसाठी धोरणे तसेच आरोग्य व कामगारातील संधीमधील लिंगभेद दोन शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) 
  2. सक्षम धोरण व अंमलबजावणी- डिजिटल समावेशकता, पारदर्शकता आणि डिजिटल कौशल्यां साठी असलेली सरकारी धोरणे आणि उपक्रम व त्या द्वारे होणारी प्रगती 
  3. वास्तविकता /परिणाम -इंटरनेट, मोबाइल फोन वापर आणि डिजिटल पेमेंट, तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील निर्णय घेण्यामध्ये स्त्री पुरुष संतुलन.
पायाभूत सुविधा या श्रेणीत भारत ६व्या क्रमांकावर असून, सक्षम धोरण राबविण्यात ४थ्या पण परिणाम पाहिल्यास १६व्या क्रमांकावर आहे. सर्वसाधारण एकूण क्रमवारीत भारत ९व्या क्रमांकावर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित या विषयातील तसेच इंटरनेट माहिती तंत्रज्ञानाच्या शिक्षणात भारताने प्रगती केली आहे पण काही मोजता येण्या सारख्याच महिला तंत्रज्ञ पदावर काम करताना दिसतात. म्हणजेच एकूण तेवढा प्रभावी परिणाम दिसत नाही. प्रभावी परिणामासाठी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. त्यासाठी गरजेचे आहे ते leading by example. आणि solutions by women for women

स्वतःमध्ये असलेल्या गुणाचा उपयोग आपल्या एखाद्या मैत्रिणीला होत असेल तर प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. WeResilient या महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या उपक्रमात तुम्हीही सहभागी होऊ शकता. तुम्ही volunteer होऊन निरनिराळे कार्यक्रम आयोजित करायला मदत करू शकता, आपल्या माहितीतील काहीतरी वेगळे कार्य करणार्‍या महिलांबदल आम्हाला कळवू शकता, WeResilient साठी लेख, कविता, आलेले अनुभव लिहू शकता, आमच्या प्लास्टिक मुक्त अभियानात सहभागी होऊ शकता. चला आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण ही एक पाऊल पुढे टाकू. यासाठी आपण फक्त एक फॉर्म भरून या कार्यात सहभागी होऊ शकता.



जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

Happy Women's Day !!!
Read More

Saturday, January 14, 2023

World Logic Day

 


आज १४ जानेवारी, जागतिक तर्कशास्त्र दिवस. लगेच तुमच्या मनात विचार आला असेल की तर्कशास्त्र दिवस म्हणजे काय आणि १४ जानेवारीलाच का? तर्कसंगती महत्वाची.

अल्फ्रेड तार्स्की आणि कार्ट गोडेल या दोन महान गणितज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ यांच्या स्मरणार्थ आजचा हा दिवस. आज अल्फ्रेड तार्स्की यांची जयंती आणि कार्ट गोडेल यांची पुण्यतिथी.UNESCO ने कौन्सिल फॉर फिलॉसॉफी अँड ह्युमन सायन्सेस (CIPSH) च्या सहकार्याने २०१९ मध्ये "जागतिक तर्कशास्त्र दिन" १४ जानेवारीला साजरा करण्याचे घोषित केला. तर्कशास्त्राच्या व्यावहारिक परिणामांबद्दल जागरूकता निर्मांण करणे हा यामागचा हेतू आहे. 

तार्स्की लहानपणापासूनच खूप हुशार. त्यांना रशियन, जर्मन, फ्रेंच व लॅटिन या भाषा अवगत होत्या. जीवशास्त्र या विषयाची आवड असल्याने तार्स्कींना त्यातच पदवी घ्यायची होती. वॉर्सा विद्यापीठातील प्राध्यापक लेसन्युस्की यांनी त्यांच्यातील गणित, तर्कशास्त्र या विषयातील बुद्धिमत्ता हेरली व तार्स्की यांना गणितातील पदवी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. वयाच्या १९ व्या वर्षी पहिला शोध निबंध लिहिणाऱ्या तार्स्कींनी २२ व्या वर्षी डॉक्टरेट होऊन विद्यापीठातील सर्वात तरुण डॉक्टरेट होण्याचा मान मिळविला. गणितात संच सिद्धांत (Set Theory), बीजगणित, युक्लिडीय भूमिती, Decidable Theory तसेच तर्कशास्त्रात सत्याची व्याख्या, Deductive Methods यासारख्या विविध विषयांवर त्यांनी संशोधन करून महत्वाचे योगदान दिले. Tarski’s indefinability Theorem हे त्यांनी सिध्द केलेले प्रमेय, गणितीय तर्कशास्त्रात व formal semantics मध्ये महत्वपूर्ण मानले जाते. 

लहानपणी गोडेल सतत प्रश्न विचारत त्यामुळे ते "Mr. Why" नावाने ओळखले जात. पदव्युत्तर अभ्यासक्रमातील शिकवले जाणाऱ्या गणितात गोडेल यांनी वयाच्या १८ वर्षीच प्रावीण्य मिळविले होते. वयाच्या २३ व्या वर्षी ते डॉक्टरेट झाले. Completeness Theorem हे त्यांच्या प्रबंधातील मांडलेले महत्वपूर्ण प्रमेय. त्यानंतर दोन वर्षानी त्यांनी Incomplete Theorem मांडला. गणिताच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या तर्कशास्त्रीय व मूलभूत अशा प्रश्नांवरील त्यांचे योगदान बहुमूल्य आहे. 

अनेक पुरस्कारांनी सन्मानित तार्स्की आणि गोडेल या दोन महान तर्कशास्त्रज्ञांना प्रणाम करून तर्कशास्त्राचे महत्व जाणून जागतिक तर्कशास्त्र दिवस साजरा करु.

World Logic Day, What is it ? Why to celebrate ? Logical questions. 

World logic day commemorates two great mathematicians and logicians, Alfred Tarski and Kurt Gödel. 
14 January is Alfred Tarski's birth anniversary and Kurt Gödel's death anniversary. In 2019, UNESCO in association with Council for Philosophy and Human Sciences (CIPSH) announced “World Logic Day” to be celebrated on 14th January. This intends to spread awareness about practical implications of logic.  

Tarski was very intelligent from childhood. He studied Russian, German, French and Latin languages. Tarsky wanted to pursue a degree in biology. A professor at the University of Warsaw, Lesniewski, saw his aptitude for mathematics and logic and encouraged Tarski to pursue a degree in mathematics. Tarsky, who wrote his first research paper at the age of 19, received doctorate at the age of 22, becoming the university's youngest doctorate. He made important contributions in various topics like Set Theory, Algebra, Euclidean Geometry, Decidable Theory, definition of truth in logic and Deductive Methods. Tarski's Indefinability theorem is considered to be important in mathematical logic and formal semantics. His emphasis on collaborative research led to many theories such as the Banach–Tarski Paradox. His 19 monographs in mathematics were published. 

As a child, Godel was known as "Mr. Why" because of his curiosity. Godel had already mastered the mathematics taught in the postgraduate course at the age of 18. He received his doctorate at the age of 23.Completeness Theorem is an important theorem presented in his thesis. Then after two years, he presented the Incomplete Theorem. His contributions to logical and fundamental questions arising in the context of mathematics are invaluable. 

Let's celebrate World Logic Day by paying tribute to the two great logicians, Tarsky and Gödel, and recognize the importance of logic.


 Snehal Kamalapur
Read More